यशवंत, कीर्तिवंत !
सामर्थ्यवंत, वरदवंत !!
पुण्यवं, नीतिवंत, जाणता राजा !!
महाराजांच्या गनिमी काव्याच्या तंत्राचा आत्मा होता, ‘वेग’, तूफान वेग आणि त्यात हत्ती आणि त्यांची संथ गती बसत नव्हती. म्हणून महाराजांनी युद्धात हत्ती वापरले नाहीत. सर्व आलमदुनिया त्यावेळी हत्ती हे प्रमुख साधन वापरत असताना महाराजांनी नवीन वाट चोखाळली आणि हत्ती हा प्राणी आणि त्याच्या चाली महाराजांनी गनिमीकावा या युद्धपद्धतीतून वगळून टाकल्या. हेच ते महाराजांचे वेगळेपण. “जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही अन् जे महाराजांनी केले, ते जगाला कधीच करता आले नाही.” म्हणून जगाला महाराजांसमोर कायम वाकावे लागते.
आज, महाराजांचे नाव वापरुन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. सत्ता व मतांच्या राजकारणासाठी शिवाजी महाराज फक्त आमचेच आहेत, अशी जणू स्पर्धाच लागलेली असते. वाईट एकाच गोष्टीचे वाटते की, छत्रपतींच्या नावाचा जयघोष करणाऱ्यांचा महाराष्ट्रात सुकाळ आहे, पण त्यांच्या विचारांना कृतीत आणणाऱ्या लोकांचा मात्र दुष्काळ आहे. आपण शिवचरित्र, महाराजांच्या गुणांना किती आत्मसात केले आहे? महाराज संपूर्णत: निर्व्यसनी होते. आज आपले पुढारी, राज्यकर्ते निर्व्यसनी आहेत का? त्यांनी आखून दिलेली जीवनपद्धती, राबवलेली राज्यपद्धती, यांचा मात्र सपशेल विसर पडलेला आहे.
शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष मोठ्या अभिमानाने आपण करतो. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि रोमांचित आठवणींचा जयजयकार करतो. जसा जसा शिवजयंती उत्सव जवळ येत जातो, तस तसे, आपले “डीपी” बदलायला लागतात. शिवजयंतीचा दिवस मावळायला लागतो आणि मागे मात्र अंधार उरतो. उत्सवी सोहळे साजरे करण्यापुरतेच शिवरायांना आपण सीमित ठेवणार आहोत का? याचा विचार करण्याची आता नितांत गरज आहे. कदाचित यातूनच आचार-विचारांचा उष:काल निर्माण होईल, हीच अपेक्षा.
No comments:
Post a Comment